कुमुदिनीच्या, नितळ निळ्या नाजुक दलांवरि मोहक ते केशर...
परि पद्मपत्र ते विरक्त विरागी गाते अलिप्ततेचे सूर..
जे जे जलबिंदू पडती त्यावर, सुंदर मोती ते दिसती..
म्हणोनि जीवन कॄतार्थ करते विवेकाची संगति..

ग्रीष्माच्या तप्त धरेवर, स्वेद बनुनि ओघळला....

कमलपत्रावरि वैराग्याच्या गातॊ स्तोत्राला...

कधी स्वातिचा बिंदु अवचित बद्ध शिंपल्यामाजि....

आर्त गीतांच्या साक्षीने मोती गालावरि ओघळला...

बापू ,हे पाहून बरं वाटलं
की तुम्ही शंभरेक वर्षांनंतर
अचानक अपील झालात...

फ्रीडम रॉक्स यू नॊ,
म्हणणा-या तरूणाईला
अचानक तुम्ही रॉकींग
आणि तुमची फिलॉसॉफी माईंड ब्लोईंग वाटू लागली...

गम्मत आहे ना,
कारण प्रामाणिक जगणे
म्हणजे डोक्यातला केमिकल लोचा काय?
असा प्रश्न कधी कधी भल्या भल्या प्रामाणिक व
इमाने इतबारे जीवन जगणा-यांना पडत असताना,
अचानक एखादा मुन्नाभाई
तुमचा संदेश घेउन येतो काय ..

त्याची गांधीगिरी मात्र भिडली,
तुमची कालौघात धुसर झालेली प्रतिमा
पुन्हा डोळ्यांना क्लीअर दिसली...
तुमचे सत्त्याचे प्रयोग
आता कालबाह्य वाटत नाहीत...

बंदे में था दम
असं पाणावलेल्या डोळ्यांनी गुणगुणारी तरूणाई,
जेव्हा आदर्शवादाकडे वळेल
तेव्हा मात्र
तुम्ही त्यांना भॆटत रहा,
असेच...
फ़क्त एकट्या मुन्नाभाईला भेटल्या-सारखे...

चैत्रबनातील गंधित वारा
हलके करित गेला गुंजन ....
परिसरातील वॄक्षलतांनो,
नुतन वर्षाभिनंदन ...


आठवते पावसात धावणे, आईची नजर चुकवत...

घसरणा-या चड्डीचा कोपरा, एका हाताने धरत

वहात्या पाण्यावर कागदाची नाव सोडत,

चिंब पावसात बेधुंद नाचत,


चिखलाचे शिंतोडे भन्नाट उडवत..

सरले ते बालपण, आता कोठे ती गम्मत???

आता ओल्या आठवणींची फ़क्त वाळलेलीच सोबत..

कधी रुसवा मौन सांगून जाते
कधी गॊडवा मौन सांगून जाते
कधी वेदनाही असते मूक वेडी
कधी मौन अंतरंग व्यापून जाते ....

मला एका मित्राने ग्रेस यांची एक अमूर्त शैलीतील कविता एस एम एस ने पाठवली होती...ऐन पावसाळ्यात..

पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला
ता-यांच्या प्रहरापाशी पाउस असा कोसळला..
निर्गंध पाकळीला स्वप्नस्थ फुलांचा बाणा..
जो हसता हसता रडतो, तो पाउस माझा राणा..

त्याला उत्तर देताना या ओळी सुचल्या...

कलिकेचे अल्लड शैशव, यौवन लतिकेचे फ़ुलताना,
दशदिशा चिंब भिजवित, अवतरतो अंगणा...
अंगणात माझ्या छेडितो, वर्षेचा तराणा,
जो रडता रडता हसतो, तो पाउस माझा राणा...

Older Posts